श्री जगदंबा विद्यालय राशीन येथे आषाढी एकादशी निमित्त अनोख्या ‘त्रिवेणी दिंडी सोहळ्याचे’ उत्साहात आयोजन


राशीन (प्रतिनिधी): जावेद काझी. :- श्री जगदंबा विद्यालय, राशीन येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून अत्यंत दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. यंदाच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात ‘वारकरी दिंडी’, ‘वृक्ष दिंडी’ आणि ‘ग्रंथ दिंडी’ अशा त्रिवेणी संगमाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता.
कार्यक्रम प्रसंगी पालखी पूजन आणि श्री विठ्ठलाची भावपूर्ण आरती विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री. उढाणे साहेब उपमुख्याध्यापक समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी,श्री. राक्षे साहेब पर्यवेक्षक श्री. कर्पे सर व श्री. बाबर सर यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली.
विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मनमोहक वेशभूषा

दिंडीमध्ये बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकून घेतली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि “ज्ञानबा-तुकाराम” च्या जयघोषाने संपूर्ण राशीन नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.
सामाजिक संदेश देणारे फलक आणि घोषणा
रंगीबेरंगी आणि मोठ्या तक्त्यांवर विद्यार्थ्यांनी पर्यावरण, स्वच्छता आणि वाचन संस्कृती जपण्याचे संदेश देणारे फलक तयार केले होते:
“झाडे लावा, जीवन फुलवा” “वारीची शान, स्वच्छतेचा मान” “ग्रंथ आमचे खरे मित्र, ज्ञानाचा हा पवित्र मंत्र” “विठ्ठल नामाचा गजर करू, स्वच्छतेचा संकल्प धरू” या घोषणांनी संपूर्ण गावचे लक्ष वेधून घेतले आणि उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले.

ग्रामस्थ आणि पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद
गावातून मिरवणूक फिरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धता पाळली. ग्रामस्थ आणि पालक वर्गाने या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत केले. गावकऱ्यांचा आणि पालकांचा सोहळ्यास उत्तम प्रतिसाद लाभला. विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि ज्ञानोपासनेचा सुंदर संदेश देणारा हा दिंडी सोहळा राशीन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.



