राशीन सह महाराष्ट्रातील असंख्य ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मालोजीराजे भिताडे यांची सार्वजनिक हीत याचिका दाखल.


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या १० हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या पार्श्वभूमीवर राशीन (ता. कर्जत) येथील सामाजिक कार्यकर्ते मालोजीराजे लालासाहेब भिताडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक जनहित याचिका दाखल केली आहे. राशीनसह अहिल्यानगर जिल्ह्यातील व राज्यातील मुदत संपलेल्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पुढील ३० दिवसांत तात्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या २ ते अडीच वर्षांपासून राज्यातील सुमारे १० हजार ग्रामपंचायतींवर प्रशासकांची राजवट लागू आहे. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर ६ महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. मात्र, शासन आरक्षण, प्रभाग रचना आणि मतदार याद्यांच्या नावाखाली निवडणुका लांबवत असल्याचा आरोप भिताडे यांनी केला आहे.

याचिकेत मांडलेले प्रमुख मुद्दे व मागण्या:
लोकशाही हक्कांची पायमल्ली: निवडणुका होत नसल्याने संविधानाच्या कलम १९(१) आणि २१ अन्वये नागरिकांचा लोकशाहीत सहभागी होण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा मूलभूत हक्क डावलला जात आहे.




