‘नशामुक्त भारत’ अभियानाला कर्जत पोलिसांची गती!
कोटा मेंटर्स विद्यालयात ३०० विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती; व्यसनमुक्त समाजासाठी पोलिसांचे आवाहन


कर्जत | प्रतिनिधी
जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ‘नशामुक्त भारत’ अभियानाअंतर्गत कर्जत पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (दि. २७) कोटा मेंटर्स माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे अमली पदार्थांविरोधात विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सकाळी ११.१५ ते १२.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील २५० ते ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकवृंद यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे, मनोज मुरकुटे आणि रवींद्र लगड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याबाबत माहिती दिली. तसेच संशयास्पद हालचाली अथवा अमली पदार्थांची अवैध विक्री आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.

अमली पदार्थांचे सेवन ही समाजाला लागलेली गंभीर कीड असून, देशाच्या भवितव्य असलेल्या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातून वाचविण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी सांगितले. व्यसनमुक्त, सुरक्षित आणि सुदृढ समाज घडविण्यासाठी पोलिसांसोबत नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कर्जत पोलिस प्रशासनाचे आवाहन
- अमली पदार्थांना ठाम नकार द्या.
- व्यसनमुक्त तरुणाई म्हणजे सुरक्षित भारत.
- अवैध अमली पदार्थांची माहिती तात्काळ पोलिसांना द्या.
- माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल.
- ‘नशामुक्त भारत’ अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा.


