राशीन येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेला दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्याचा वेढा; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात!


राशीन (प्रतिनिधी) राशीन जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शासकीय मुलींच्या शाळेच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणावर साचले आहे. यामुळे शाळा परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी १७ जून २०२६ रोजी राशीन ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्राम विस्तार अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

४०० ते ५०० विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ!
राशीन येथील या जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत पहिली ते चौथी या वर्गात तब्बल ४०० ते ५०० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेच्या पाठीमागे आणि दोन्ही बाजूंना गटारीचे दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी जमा झाले आहे. यामुळे संपूर्ण शालेय आवारात आणि वर्गांमध्ये कमालीची दुर्गंधी सुटली आहे.

वर्गात बसणेही झाले कठीण; शैक्षणिक कामकाजात अडथळा
शाळेत पसरलेल्या या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे चिमुरड्या विद्यार्थिनींना वर्गात बसणेही कठीण झाले आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे. या अत्यंत दूषित आणि आरोग्याला घातक ठरणाऱ्या वातावरणामुळे दैनंदिन शालेय कामकाज चालवणे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाला अत्यंत जिकिरीचे झाले आहे.
मुख्याध्यापकांचा प्रशासनाला इशारा:
“शाळेतील शेकडो विद्यार्थिनींच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे कोणतीही मोठी साथ पसरण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि शालेय परिसरात युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, यासाठी आम्ही रीतसर निवेदन दिले आहे.”

आता या गंभीर समस्येवर राशीन ग्रामपंचायत प्रशासन किती तातडीने पावले उचलते आणि या चिमुरड्या मुलींना दुर्गंधीच्या त्रासातून कधी मुक्त करते, याकडे पालकांचे व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


