चारा टंचाईचे संकट गडद; कर्जतमध्ये तात्काळ चारा छावण्या सुरू करा!


कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यात यंदा गंभीर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पशुपालक व शेतकरी मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात तात्काळ चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) सोशल मीडिया सेलचे कर्जत तालुकाध्यक्ष दिपक रामदास यादव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तहसील कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अपुऱ्या पावसामुळे तालुक्यात चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या संगोपनासाठी आवश्यक असलेला हिरवा व वाळलेला चारा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पशुधन वाचवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कर्जत तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांची बिकट परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा आणि चारा छावण्या सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी दिपक रामदास यादव यांच्यासह बाळासाहेब साळुंके, तात्या ढेरे, विशाल मेहेत्रे, श्रीमंत शेळके, संजय मोढळे, मंगेश शिंदे, संजय भिसे, अशोक धांडे, स्वप्नील तनपुरे, सचिन मोडगे आणि गणेश गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

