शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी – राष्ट्रीय समाज पक्षाची तहसीलदारांकडे निवेदन

(कर्जत प्रतिनिधी) राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटात असून आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार शेतमजुरांच्या तुलनेत शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाले असून शेतीतून होणारा तोटा वाढत चालला आहे. अशा गंभीर परिस्थितीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालय, कर्जत येथे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात राज्य शासनाने संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, अशी घोषणा केली होती. आता ती प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष सोनू (दादा) भिसे, जिल्हा सरचिटणीस रमेश व्हरकटे, युवक अध्यक्ष महेंद्र कोपनर, तसेच भाऊसाहेब खामगळ, नाना आटोळे, बापू विटके, संतोष कानडे, शिवाजी अनारसे आणि रवी पवार यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
पक्षाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, जर शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.