कापरेवाडी हद्दीत जंगल कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यास विलंब – नवनाथ मोडके


(कर्जत प्रतिनिधी) :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट असताना, कर्जत वनपरिक्षेत्रातील वनरक्षक श्री. उमेश खराडे यांच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप कापरेवाडीचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मोडके यांनी केला आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कर्जत उपकेंद्रासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी कापरेवाडी येथे भाडेतत्त्वावर जमीन घेऊन सौर ऊर्जा प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर कर्जत तालुक्यातील अंदाजे 20 गावांतील हजारो शेतकऱ्यांना दिवसा अखंड वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून कृषी उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मात्र, सदर प्रकल्पासाठी आवश्यक परवानग्या, सर्वेक्षण व इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनही संबंधित वनरक्षकांकडून वारंवार हरकती, तक्रारी व अडथळे निर्माण करण्यात येत असल्याने कामाची गती मंदावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास विलंब होत असून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्ण राहिले आहे.

नवनाथ मोडके यांनी म्हटले आहे की, शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला अडथळा निर्माण करणाऱ्या वनरक्षक उमेश खराडे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच त्यांच्या कृतीमुळे शासन, महावितरण, प्रकल्प विकासक आणि स्थानिक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक व प्रशासकीय नुकसानीची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी.
या प्रकल्पामुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करून काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व स्थानिक नागरिकांकडून मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार तसेच जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येत आहे. – नवनाथ मोडके माजी,उपसरपंच, ग्रामपंचायत कापरेवाडी



