टेडी बेअर आणि गोरिलाच्या साथीने चिमुकल्यांचे स्वागत!
राशीनच्या जगदंबा विद्यालयात रंगला अनोखा प्रवेशोत्सव.


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – राशीन येथील नामांकित श्री जगदंबा विद्यालयात इयत्ता पाचवीच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अत्यंत उत्साहात आणि अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांना आनंददायी वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाने टेडी बेअर आणि गोरिला मॅस्कॉटचा (पोशाख) विशेष वापर केला होता. या अनोख्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला.

गावातून निघाली वाजत-गाजत फेरीनवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सर्व मुलांच्या हातात रंगीबेरंगी फुगे देण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात गावातून विद्यार्थ्यांची भव्य फेरी काढण्यात आली. यावेळी जागोजागी ग्रामस्थांनी या चिमुकल्यांचे प्रेमाने स्वागत केले. फेरीनंतर विद्यालयात आल्यावर सर्व नवीन विद्यार्थ्यांना शासकीय पाठ्यपुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांना दरवर्षी रोख बक्षिसेयाच कार्यक्रमाचे औचित्य साधून राशीनचे प्रसिद्ध डॉ. चंद्रकांत विठ्ठल शेंद्रे साहेब यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना २२ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविले. विशेष म्हणजे, शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. शेंद्रे यांनी इथून पुढे दरवर्षी प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्तरावर बक्षीस देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. तसेच शाळेचे शिक्षक विकी साळवे सर यांनी नुकतीच एलएलबी परीक्षा उत्तीर्ण करून वकिलीची पदवी मिळवल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.मान्यवरांची मोठी उपस्थितीकार्यक्रमाला स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य शाहूराजे राजेभोसले, विकासजी मोढळे, रामकिसन साळवे, ज्येष्ठ नागरिक गौतम कानगुडे, भाऊसाहेब राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. उपस्थित सर्व पाहुण्यांचे व पालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश उडाणे साहेब, उपमुख्याध्यापक संग्राम राक्षे साहेब, पर्यवेक्षक किशोर करपे व शिवाजी बाबर साहेब यांच्यासह सर्व शिक्षक आणि शालेय कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रकाश उडाणे यांनी केले, प्रास्ताविक भगवान शिंदे सर यांनी मांडले, तर आभार विकी साळवे यांनी मानले.