खांडवी – कोंभळी परिसरात नव्याने उभारलेले विद्युत खांब कोसळले; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

(कर्जत प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील खांडवी-कोंभळी परिसरात अवकाळी पावसामुळे नवीन विद्युत वाहिन्यांसाठी (एक्सप्रेस लाईन) उभारण्यात आलेले विद्युत खांब कोसळल्याची घटना घडली आहे. खांडवी येथील तुषार भास्कर तापकीर आणि बापुराव अमृत तापकीर यांच्या डाळिंब बागेवर हे खांब पडल्याने कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदारामार्फत परिसरात नवीन विद्युत वाहिन्यांचे काम सुरू आहे. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसात नव्याने उभारलेले काही विद्युत खांब उन्मळून पडले. विशेष म्हणजे विद्युत वाहिनी सुरू होण्यापूर्वीच खांब कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या घटनेनंतर नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी (NCC) मार्फत कर्जत-1, कर्जत-2, मिरजगाव आणि माहिजळगाव उपकेंद्रांतर्गत राबविण्यात येत असलेल्या RDSS योजनेच्या गावठाण फिडर सेपरेशन व नवीन गावठाण फिडरसाठी उभारण्यात आलेल्या विद्युत खांबांच्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी खांबांसाठी आवश्यक खोलीचे खड्डे न घेता कमी खोलीतच खांब उभारण्यात आले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीटचा वापरही आवश्यक प्रमाणात न करता केवळ खांबाच्या वरच्या भागात करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा असून पहिल्याच पावसात खांब कोसळल्याने या आरोपांना बळ मिळाले आहे.
या घटनेमुळे वीज वितरण बळकटीकरण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. खांब कोसळल्यामुळे शेतकरी आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

