२७ एप्रिलपासून बेमुदत आंदोलन : तहसीलदारांना निवेदन, पदाधिकारी व विक्रेत्यांची मोठी उपस्थिती


कर्जत / प्रतिनिधी : – कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभर २७ एप्रिल २०२६ पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदला कर्जत तालुक्यातून ठाम पाठिंबा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका सीड्स, पेस्टीसाईड्स अँड फर्टिलायझर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गदादे, सचिव प्रफुल्ल बरबडे, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू सुद्रिक, विशाल फडतरे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय भोसले, पंडित होले, पोपट सुद्रिक, संकेत पाटील, नितीन भोईटे, सुभाष गांगर्डे, उपमन्यू शिंदे, हनुमंत उकले, अजिंक्य मेहत्रे, भाऊसाहेब धोदाड, अशोक झगडे, अविनाश गोरे, राजू खरात, अमर धांडे, अमोल मेहत्रे, अजय खराडे, अक्षय ढेरे, सागर सरडे, पृथ्वीराज शेंडगे यांच्यासह तालुक्यातील कृषी विक्रेत्यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत शासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
“प्रश्न सोडवा, अन्यथा बंद कायम”
“गेल्या चार ते पाच वर्षांपासून विविध मागण्यांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. लिंकिंगची अट, बनावट बियाण्यांचा प्रश्न, कमी मार्जिन आणि ‘सॅम्पल फेल’ची जबाबदारी आमच्यावर टाकली जाते. या अन्यायाविरोधात आता एकजुटीने लढण्याशिवाय पर्याय नाही,” असे अध्यक्ष विक्रम गदादे यांनी ठामपणे सांगितले.

“खरीप हंगामावर परिणामाची शक्यता”
“२७ एप्रिलपासून तालुक्यातील एकही कृषी सेवा केंद्र सुरू राहणार नाही. शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर आगामी खरीप हंगामावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील,” असा इशारा सचिव प्रफुल्ल बरबडे यांनी दिला.
यावेळी उपस्थित सर्व विक्रेत्यांनी राज्य संघटनेच्या निर्णयाला एकमुखाने पाठिंबा देत बेमुदत बंद यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.



