पावसासाठी राशीनमध्ये मुस्लिम बांधवांचे साकडे; अल्लाहच्या दरबारात नमाज व दुवा.


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) : – मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. शेतातील पिके करपू लागली असून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बळीराजावर आलेले हे सुलतानी संकट दूर व्हावे आणि सर्वत्र समाधानकारक पाऊस पडून शिवार सुजलाम-सुफलाम व्हावे, यासाठी राशीन येथील मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने गुरुवार शुक्रवार शनिवार दिनांक १७ ते १९ रोजी दुपारी २ वा. तीन दिवस लागोपाठ गावाबाहेर मदिना मकतब फाउंडेशन समोरील ग्राउंडवर काझीनगर परीटवाडी येथे राशीन व परिसरातील मुस्लिम समाज बांधव एकत्रित जमा होऊन विशेष प्रार्थना करून अल्लाहच्या दरबारात भरपूर पाऊस पडू दे, जीवित पक्षी प्राणी व मनुष्य जाती च्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू दे, शेतकरी बळीराजा सुखी ठेव , नदी नाले ओसांडून वाहू दे, मुबलक असा भरपूर पाऊस पडू दे

असे साकडे दुवा द्वारे अल्लाहकडे मागण्यात आले.बांधवांनी एकत्र येत अत्यंत श्रद्धेने आणि भावुक वातावरणात दोन्ही हात उंचावून अल्लाहकडे दुवा मागितली. “हे परवरदिगारा, संपूर्ण जगाचा सांभाळ करणाऱ्या अल्लाहा, देशावर आणि आपल्या भागावर आलेले दुष्काळाचे सावट दूर कर. आमच्या शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी मुबलक पाऊस पडू दे,” अशी आर्त हाक या वेळी मारण्यात आली.
या प्रार्थनेदरम्यान परिसरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता आहे. तो संकटात असेल तर संपूर्ण समाज अडचणीत येतो. म्हणूनच सर्व भेदभाव बाजूला ठेवून केवळ पावसासाठी आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आम्ही अल्लाहकडे ही मागणी केली आहे,” असे या वेळी उपस्थित समाजबांधवांनी सांगितले.

विशेष प्रार्थनेनंतर उपस्थित नागरिकांनी पावसाचे आगमन व्हावे आणि संपूर्ण परिसर धान्याने व समृद्धीने नटून जावा, अशी इच्छा मौलाना शहनवाज कुरेशी,मौलाना रहीम शेख व मौलाना उबेद काझी यांनी नमाज व दुवाद्वारे व्यक्त केली. मौलाना रहीम शेख यांनी अंतकरणापासून तळमळीने व्याकुळ होऊनअल्लाह कडे मागितलेल्या दुवा मुळे आणि जमलेल्या मुस्लिम बांधवांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. जातीय मतभेद विसरून शेतकऱ्यासाठी व राशिन व परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासाठी गावाबाहेर भर दुपारच्या कडक उन्हात प्रार्थना करत दिसताच राशीन परिसरातील नागरिकांकडून व इतर हिंदू बांधवांकडून या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.



