राशिनमध्ये श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचा रोप्य महोत्सव उत्साहात संपन्न
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सप्ताह; महाप्रसाद व ग्रामफेरीने सोहळ्याची सांगता


राशिन (जावेद काझी): – राशिन शहरात मंगळवार दिनांक ८ रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात कार्यक्रम सोहळा पार पडला . गेल्या २५ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या या सोहळ्याचे यंदाचे २५ वे वर्ष असल्याने ‘रोप्य महोत्सवी वर्ष’ म्हणून हा सप्ताह विशेष धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील पहिल्या पाच प्रमुख सप्ताहांमध्ये गणल्या जाणाऱ्या या सोहळ्याला यंदा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम सप्ताह म्हणून नावलौकिक मिळाला आहे.
या रोप्य महोत्सवी सप्ताहाचे संपूर्ण आयोजन आणि नियोजन राशिन शहर नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. सप्ताहातील सात दिवस महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य हरिकीर्तने पार पडली. या धार्मिक पर्वणीचा लाभ राशिनसह परिसरातील हजारो भाविकांनी घेतला.

आठव्या दिवशी ह.भ.प. ॲड. अरुण श्रीधर पुंडे (वकील) यांचे काल्याचे प्रबोधनात्मक व उत्कृष्ट कीर्तन पार पडले. कीर्तनानंतर शहरातून भव्य ग्रामफेरी काढण्यात आली. यामध्ये महिला, पुरुष आणि बालकांसह सर्व स्तरांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विठ्ठल-रखुमाई आणि संत सेना महाराजांच्या जयघोषात आनंद लुटला.
व्यापार बंद ठेवून नाभिक बांधवांचा सहभाग
सप्ताहाच्या सांगता दिवशी मंगळवारचा पारंपरिक बाजाराचा दिवस असूनही, नाभिक समाजातील सर्व पुरुष, महिला व कुटुंबीयांनी आपापली दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवले. संपूर्ण दिवस या धार्मिक सोहळ्यासाठी देऊन समाजबांधवांनी आपली एकता आणि श्रद्धा प्रकट केली.
महाप्रसादाचे आयोजन
या सोहळ्यातील अन्नदान व महाप्रसादाचा संपूर्ण खर्च चंद्रकांत जगताप यांनी केला. काल्याच्या कीर्तनानंतर लापशी, सांबर आणि भाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. राशिनमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांतील दिग्गज मंडळी, कर्जत तालुक्यातील मान्यवर आणि ग्रामस्थांनी या महाप्रसादाचा व कीर्तनाचा लाभ घेतला.
“गेल्या २५ वर्षांची अखंड परंपरा आणि समाजबांधवांचे सहकार्य यामुळेच हा रोप्य महोत्सव एवढ्या दिमाखात साजरा होऊ शकला. — राशिन शहर नाभिक संघटना



