Rohit Pawar: तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही, रोहित पवारांचा सुनील तटकरेंवर हल्लाबोल
Rohit Pawar: सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह प्रफुल पटेलांनी राज्यात नवे पर्व सुरू झाल्याचे म्हटले आहे.


राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यासह प्रफुल पटेलांनी (Praful Patel) राज्यात नवे पर्व सुरू झाल्याचे म्हटले आहे, त्यावरती आता शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) या त्यावरून आक्रमक होत, तुम्ही नवे पर्व सुरु झालं म्हणता, पण अजितपर्व कधीच संपणार नाही असं वक्तव्य केलं आहे.
साधा एक एफआयआर देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा
आज अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत रोहित पवारांनी काही माहिती आणि काही कागदपत्रे देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली, या भेटीनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, माझ्यावरती काही लोक आणि सत्तेतील नेते टीका करत आहेत. काल अजितदादांच्या पक्षातील जे काही प्रमुख नेते आहेत त्यांनी सांगितलं की मी इव्हेंट करतो आहे. बर तुम्ही असं म्हणताय की, मी इव्हेंट करतोय, तर मग तुम्ही सत्तेत आहात, एफआयआर हा सगळ्यांचा अधिकार आहे, मी विरोधात आहे म्हणून तुम्ही माझा एफआयआर घेऊ देत नाही, नाहीतर घेतला जात नाही. तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटायचं वाटू द्या पण, सत्तेचा वापर करून तपास कोणत्या दिशेने जात आहे हे पाहणं किंवा बाकी सगळं बाजूला ठेवून, साधा एक एफआयआर देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा, असं आवाहनही रोहित पवारांनी केलं आहे.

अजित पर्व संपणारच नाही, कारण लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे
पुढे ते म्हणाले, नुसती भाषण करत चाललेले आहात, आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जनता, इतर पक्षातील लोक, दादांना न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि हे लोक मात्र भाषण करत राजकीय टिप्पणी करत असतील आणि दुर्दैव असं की त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की, नवीन पर्व सुरू झालं आहे, लक्षात ठेवा, अजित पर्व संपणारच नाही, कारण लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे, ही घटना घडली याबाबतीत शंका आहेत, त्यामुळे न्याय देण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर आजच ती वेळ आहे, आजच एफआयआर घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा, असं म्हणत रोहित पवार यांनी नाव न घेता सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

अजित पवारांना कंट्रोल करु शकत नव्हते, पण आता सुनेत्रा पवारांना कंट्रोल करु शकतो असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा (तटकरे-पटेलांचा) गैरसमज आहे. एक पुतण्या म्हणून विनंती आहे की काकींनीही सांभाळून राहावं असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे, त्याचबरोबर शरद पवारांच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात चाललेल्या चर्चांवर बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कुठेही लोकांना अडचण होऊ नये, दंगल उसळू नये म्हणून लोकांच्या हितासाठी शरद पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं. ते बोलताना कॅमेऱ्याकडे बघत नव्हते तर त्यांना वाचावं लागत होतं. पवार साहेब इतके भावनिक झाले होते, त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. त्यामुळे त्यांना काही गोष्टी लिहून दिल्या, त्या त्यांनी वाचल्या. याचं तुम्ही आज राजकारण करत आहात…




