कर्जतमध्ये अतिक्रमण कारवाईवरून नागरिक आक्रमक, पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

कर्जत (ता. कर्जत) : कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी गुरुवारी केलेली अतिक्रमणविरोधी कारवाई ही एकतर्फी, पक्षपाती व अन्यायकारक असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र निषेध केला. संबंधित नागरिकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांवर सदोष कार्यपद्धतीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
शहरातील प्राचीन दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी अखंड हिंदू समाजाने अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू केली. याअंतर्गत सोमवारी काही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली, तर काही अतिक्रमणधारकांना गुरुवारी नव्याने नोटीस बजावण्यात आल्या होत्या.
त्यानुसार, गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी जायभाय यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटवण्याची कारवाई पुन्हा सुरू झाली. मात्र कारवाईच्या वेळी स्थानिक नागरिकांनी थोडी मुदत वाढवून देण्याची विनंती केली. तरीही मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई न थांबवता पक्की घरे पाडण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर माजिद पठाण, युनूस पठाण, मिनू सय्यद, मुबीन बागवान आदी नागरिकांनी महिलांसह पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत मुख्याधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी संतप्त नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या प्रकरणावर मुख्याधिकारी अक्षय जायभाय यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महाराष्ट्र नगरपरिषदा कायदा १९६५ च्या कलम १७९ नुसार रस्त्यावरील अतिक्रमण कोणतीही नोटीस न देता हटवण्याची तरतूद आहे. तरीही कर्जत नगरपंचायतीने ४८ तासांची नोटीस देत कारवाई कायदेशीर पद्धतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच केली आहे. संबंधितांना आपली बाजू मांडण्यासाठी विहित मुदत देण्यात आलेली होती.”
कर्जतमधील ही कारवाई व त्यावर झालेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय बनली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अभावाचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.