मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सत्ताधाऱ्यांचा वाढता पाठिंबा; राज्यात राजकीय समीकरणे बदलणार?


(समृध्द कर्जत प्रतिनिधी) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांचाही वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, महायुतीतच अंतर्गत दबावाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर काही तासांतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार-खासदार आझाद मैदानावर दाखल झाले. बीडचे संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) आणि माजलगावचे प्रकाश सोळंके (अजित पवार गट) यांनी भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला. सोळंके यांनी “हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही दादांच्या सोबत आहोत,” असे स्पष्ट केले. तर क्षीरसागर यांनी “जरांगे दादा केवळ मराठा नव्हे, तर इतर समाजावर अन्याय झाल्यासही लढतात,” असे नमूद केले.

सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा पाठिंबा
अजित पवार गटातील अनेक आमदारांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
• माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उपोषण सुरू होताच भेट दिली.
• गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी “मी आंदोलक आणि सरकारचा दुवा आहे,” असे सांगत आंदोलनास पाठींबा जाहीर केला.
• पाथरीचे आमदार राजेश विटेकर यांनीही भेट घेऊन ऐक्य दर्शविले. • विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला.
• वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी आंदोलनात थेट सहभाग घेत मराठा बांधवांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था केली.
• देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी मुंबईकडे जाणाऱ्या आंदोलकांना भेटून पाठिंबा दिला.
दरम्यान, भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी देखील जरांगे पाटलांची भेट घेऊन मध्यस्थीची भूमिका घेतली. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करीन,” असे त्यांनी माध्यमांशी सांगितले. विरोधकांचाही भक्कम पाठिंबा विरोधी पक्षानेही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला भक्कम साथ दिली आहे.
• शरद पवार गटातून खासदार निलेश लंके भास्कर भगरे बजरंग सोनवणे आणि माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेतली. बजरंग सोनवणे यांनी “शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सोबत राहू,” असे जाहीर केले.
• उद्धव ठाकरे गटाकडून खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील प्रवीण स्वामी खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांनी जरांगे पाटलांशी चर्चा केली. जाधव यांनी “आम्ही सत्तेत असतो तर आमची बांधिलकी वेगळी असती,” असे सांगत सरकारवर टीका केली.
• माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आझाद मैदानावर भेट दिली.
राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मिळालेल्या सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे राज्यात राजकीय समीकरणे हलू लागली आहेत. विशेषतः, महायुतीतील अजित पवार गटाच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असल्याने “महायुतीतच अंतर्गत दबावाचे राजकारण सुरू झाले आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे वरिष्ठ नेते काहीसे अलिप्त दिसत असताना, अजित पवार गट लोकभावना ओळखून वेगळा पवित्रा घेत आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.



