अकाली मातृत्वाची समस्या गंभीर बनत आहे…योगेश अब्दुले


“पालकांनी जबाबदारी झटकण्यासाठी मुलींचे लवकर लग्न लावू नये. बालविवाह ही एक ज्वलंत समस्या बनली आहे. कमी वयात लग्न झाले तर अनेक शारीरिक, मानसिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. अकाली मातृत्वाची समस्या गंभीर बनत आहे. बालविवाह जर एखाद्या ठिकाणी होत असेल तर मुक्ती वाहिनीला माहिती द्या किंवा दहा १०९८ नंबरला माहिती द्या आणि बालविवाह रोखा. पालकाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी बालविवाह रोखला पाहिजे. मुलींच्या शिक्षणाला बाधा येता कामा नये” असे मत उडान बालविवाह प्रतिबंधकचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पठारवाडी येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील बौद्धिक सत्रात ते बोलत होते.
या कार्यक्रमप्रसंगी प्रबोधिनी पठाडे हिने आई-वडिलांचे महत्त्व आपल्या स्वरचित कवितेतून सादर केले. एन.एस.एस स्वयंसेवक साक्षी वाघ हिने ‘मी जिजाऊ’ ही कविता सादर केली. या कार्यक्रमासाठी मोहन शिंदे, पठाडे महाराज, गावातील भगिनी उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेवक दिग्विजय रानमाळ याने तर आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भोसले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हम होंगे कामयाब या गीताने झाली.



