व्यावसायिकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा – नंदलाल काळदाते, तालुका सरचिटणीस, भाजपा


कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अन्यायाचा डोंगर कोसळताना दिसत आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे पहिल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे सध्याच्या पिकासाठी अत्यावश्यक असलेल्या युरिया खताचा कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांची सर्रास पिळवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
यासंदर्भात तालुका कृषि अधिकारी कर्जत यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकरी युरियासाठी गेले असता “साठा नाही”, “युरिया संपला आहे” अशी उत्तरे दिली जात आहेत. मात्र, काही ठिकाणी युरिया उपलब्ध असतानाही तो थेट न देता शेतकऱ्यांना इतर महागडी खते खरेदी करण्यास भाग पाडले जात आहे.

विशेष म्हणजे, युरियासोबत लिंकिंग करून दिली जाणारी ही इतर खते युरियाच्या किमतीपेक्षा जास्त दराची असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अशी सक्ती म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक कृषी सेवा केंद्राकडे शासनाने दिलेला बफर स्टॉक नेमका किती आहे, तो कुठे आणि कसा वितरित केला जात आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जनता पक्ष सरचिटणीस नंदलाल काळदाते, तालुका अध्यक्ष अनिल गदादे, दादासाहेब सोनमाळी, दत्ता नलवडे, हर्षल शेवाळे, शरद मेहेत्रे, स्वप्नील तोरडमल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



