मंत्री राधाकृष्ण विखे आणि शंभूराजे देसाई यांनी केली अतिवृष्टीग्रस्त कर्जत भागात पाहणी


कर्जत (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी आणि नवलेवाडी या अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि ना. शंभूराजे देसाई यांनी केली. या भागातून जाणाऱ्या कुकडी कालव्याच्या रुंदीकरणाचे आणि मजबुतीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी कालव्याभोवतीच्या अतिक्रमणामुळे व भराव खचल्याने कालव्यातील पाणी वाड्यावस्त्यांमध्ये शिरल्याची समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर उपाय म्हणून कालव्याचे सर्व्हेक्षण तातडीने करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन ना. विखे पाटील यांनी दिले. याशिवाय जलसंधारण विभागाशी संबंधित इतर कामांचे प्रस्तावही गांभीर्याने तयार करून त्वरित मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

गावकऱ्यांनी अनेक वर्षांपासून पुलाच्या मागणीबाबत केलेल्या तक्रारीकडेही मंत्र्यांनी लक्ष दिले. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंत्यांना समन्वय साधून तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. झालेल्या नुकसानीचे पंचनामे जलद गतीने पूर्ण व्हावेत यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. मदतीपासून कोणताही नागरिक वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असेही ना. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ग्रामस्थांशी संवाद साधताना ना. शंभूराजे देसाई म्हणाले की, “शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी राज्य सरकारमधील सर्व मंत्री वेगवेगळ्या भागात गेले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोण काय टीका करतो याला आम्ही महत्त्व देत नाही.”

यावेळी माध्यमांशी बोलताना ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विधानांवर टीका केली. ते म्हणाले की, “संजय राऊत रोज बोलले नाही तर संपादक म्हणून त्यांची ओळख राहणार नाही. त्यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देत नाही.” तसेच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की, “माहूरची देवी आमची कुलदेवता आहे. अनेक वर्षांपासून मी तिथे जात आहे आणि आम्हाला देवी प्रसन्न होते. त्यांना होत नसेल तर त्यात माझा दोष नाही.”
दरम्यान, महाविकास आघाडीच्या काळातील दौऱ्यांचा उल्लेख करत टीका करण्यात आली असली तरी सध्याच्या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर राजकारण करणे योग्य नाही, असे ना. शंभूराजे देसाई यांनी सांगितले.याप्रसंगी युवा नेते शहाजीराजे राजे भोसले उपस्थित होते



