अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र श्री. आबासाहेब कवळे यांची उपसचिव पदी पदोन्नती

मिरजगाव: नागलवाडी, तालुका- कर्जत, जिल्हा- अहिल्यानगर येथील मूळ रहिवासी असणारे व सध्या मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात अवर सचिव म्हणून कार्यरत असणारे श्री. आबासाहेब आत्माराम कवळे यांना महाराष्ट्र शासनाने नुकतीच आवर सचिव पदावरून उपसचिव पदावर पदोन्नती देऊन विधी व न्याय विभागात पदस्थापना दिली आहे.
श्री. आबासाहेब कवळे यांचे प्राथमिक शिक्षण नागलवाडी ता. कर्जत येथे झाले असून माध्यमिक शिक्षण, टाकळसिंग, तालुका- आष्टी, जिल्हा- बीड येथे ग्रामीण भागात झाले असून त्यांनी मंत्रालयात वेगवेगळ्या विभागात काम केले आहे.
मंत्रालयात महसूल विभागात कार्यरत असताना महसूल विभागामार्फत नागरिकांना दिले जाणारे सर्व प्रकारचे दाखले/ प्रमाणपत्र यांच्या कार्यपद्धतीचे सुलभीकरण, अद्यावतीकरण व प्रमाणीकरण, तसेच शासनाच्या सुवर्ण जयंती राजस्व अभियान कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणीत महत्त्वाचा वाटा होता.
तसेच श्री. आबासाहेब कवळे यांनी भारत निवडणूक आयोगाअंतर्गत ईव्हीएम -व्हीव्हीपॅट यंत्रांकरिता महाराष्ट्राचे समन्वय अधिकारी म्हणून सुमारे ५ वर्ष अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निवडणूक यंत्रे सुरक्षित ठेवण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात कायमस्वरूपी गोदामे उभारणे/ दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने घेणे, निवडणूक यंत्रांबाबत भारत निवडणूक आयोग, उत्पादक कंपन्या व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांशी समन्वय राखणे, निवडणूक यंत्रांबाबत गैरसमज दूर करण्याकरिता जनजागृती करणे व निवडणूक यंत्रांचे व्यवस्थापन, तसेच निवडणुक काळात भारताचे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार इतर राज्यात जाऊन निवडणूक यंत्रांबाबतचे कामकाज विहित कार्यपद्धतीनुसार व पारदर्शक पद्धतीने केले जाते की नाही याचे पर्यवेक्षण करून तसा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करणे ही कामगिरी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली आहे.
सामान्य प्रशासन विभागात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या आस्थापनेवर काम करताना श्री आबासाहेब कवळे यांनी सर्व भाप्रसे अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकाचे संगणकीकरण (ई सेवा पुस्तके) व सर्व शासकीय/ निम-शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची सेवानिवृत्ती प्रकरणे जलद गतीने अंतिम करण्याकरिता प्रचलित कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे याबाबत उल्लेखनीय काम केले आहे.
मंत्रालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्क कक्ष अधिकारी म्हणून दाखल होण्यापूर्वी श्री. आबासाहेब कवळे यांनी मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून मलबारहिल पोलिस ठाणे, नागपाडा पोलीस ठाणे, बॉम्ब शोध व नाशक पथक, विशेष सुरक्षा पथक, गुन्हे शाखा, मुंबई या ठिकाणी उल्लेखनीय काम केले आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील छोट्याशा खेड्यातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन श्री. आबासाहेब कवळे यांनी हे यश संपादन केले असल्याने ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी आहे. त्यामुळे श्री. आबासाहेब कवळे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.