आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित !

कर्जत (प्रतिनिधी) :- मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रा स्थगित केली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.
आज आमदार संदीप क्षीरसागर, रोहित आर. आर. पाटील, जयदेव गायकवाड यांच्या उपस्थितीत व राज्यातील विविध जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहित पवार यांनी हा निर्णय जाहीर केला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सध्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्वस्थ झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी येथे आले, पण त्यांनी मराठा आरक्षणावर एक शब्द काढला नाही. मनोज जरांगेची प्रकृती ढासळत चालली आहे. ते प्रामाणिकपणे समाजासाठी लढत आहेत. राज्य सरकार मराठा, धनगर समाजाच्या बाबतीत संवेदनशील नाही. आम्ही ही यात्रा युवा हितासाठी काढली.
गावबंदीच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवता आहात का? या प्रश्नावर रोहित पवार म्हणाले की, गावबंदीच्या निर्णयावर हा निर्णय घेतला नाही, आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. या यात्रेदरम्यान एका गावात मी स्वतः सर्वांना भेटलो, तेव्हा आम्ही मराठा आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले. तेव्हा सर्वजण आमच्याबरोबर काही अंतर चालले. मी गावबंदीमुळे अजिबात स्थगिती केली नाही, तर ज्यांच्यासाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ असताना ही यात्रा सुरू ठेवणे योग्य नाही.
आता राज्य व केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे, नवी संसद दाखवायला तुम्ही विशेष अधिवेशन घेता, मग आता महाराष्ट्र पेटला असताना तुम्ही का अधिवेशन बोलवत नाही? असा सवाल त्यांनी केला.