वादळी वाऱ्यामुळे कौडाणे गावातील शेतकऱ्याचे सोलर पंप उध्वस्त.

कर्जत (ता. कर्जत) – तालुक्यातील कौडाणे गावामध्ये मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः, शेतकरी कल्याण जानू जगधने यांच्या विहिरीवर बसवलेला सोलर पंप जोरदार वाऱ्यामुळे उचलला जाऊन जमिनीवर आपटल्याने पूर्णपणे नष्ट झाला आहे.
जगधने यांनी त्यांच्या शेताच्या सिंचनासाठी लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा संचालित पंप बसवला होता. मात्र, वादळी वाऱ्याने हा पंप उखडून टाकला असून, उपकरणे तुटून खराब झाली आहेत. यामुळे त्यांच्या शेतीच्या सिंचनावर मोठा परिणाम होणार असून, येणाऱ्या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेमुळे जगधने कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी व शेतकरी संघटनांनी देखील या घटनेची दखल घेत प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून योग्य मदत देण्याची मागणी केली आहे.
गावातील इतर शेतकरीही सोलर पंप बसवत असून, अचानक येणाऱ्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतर कृषी यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने त्वरित हालचाल करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.