कुकडी प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडा आ. रोहित पवार यांचे कार्यकारी संचालकांना विनंती पत्र

(समृध्द कर्जत) :- कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हाळी पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कुकडी डाव्या कालव्यातून दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना दिले आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर संवाद साधून कालव्यातून पाणी सोडण्याची विनंती केली आहे. येत्या ३ ते ४ दिवसात कुकडी प्रकल्पातून पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
मतदारसंघातील पाण्याबाबत आमदार पवार यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. त्यातही कर्जत-जामखेड मतदारसंघातील कुकडी कालवा हा महत्त्वाचा असून ५४ गावांमधील शेती या कालव्यावर अवलंबून आहे. ही गावे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठीही सर्वस्वी कुकडी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढल्याने पाण्याची पातळी खालावली आहे परिणामी वेळेत पाणी न मिळाल्यास चारा पिके, फळबागा आणि उन्हाळी हंगामातील इतर पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. याशिवाय पाण्याची टंचाईदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तालुक्यात पवार यांच्या माध्यमातून
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांना पिण्यासाठी तसेच जनावरांनाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे टँकर देण्यात आले आहेत. यासाठी पवार यांच्या संपर्क कार्यालयात वेगळा पाणीटंचाई कक्ष स्थापण करण्यात आला असून ग्रामस्थांनी मागणी केल्यास त्याची तातडीने दखल त्या गावाला टँकरने पाणीपुरवठा घेऊन केला जात आहे.
पवार यांनी मतदारसंघातील दौऱ्यावर असताना ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी पाण्याची सोय करण्याची मागणी त्यांच्याकडे केली. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना पत्र देऊन दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले. भोसे खिंडीतून सीना धरणात पाणी सोडण्याचीही मागणी या पत्रात केली आहे. कुकडीचे पहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले त्यावेळीही ते ४० दिवसांचेच असावे असा आग्रह पवार यांनी धरला होता. सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी ४० दिवसांचे आवर्तन गरजेचे आहे अन्यथा सर्व गावांना पाणी मिळणार नाही आणि लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल याची कल्पनाही त्यांनी दिली होती. तसेच मे अखेरीस किंवा जून महिन्याच्या आसपास आणखी एक आवर्तन सोडण्याचा मुद्दाही त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मांडला होता.