“नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे राजीव गांधी नगर अंधारात!”
सुमित भैलुमे यांचा आरोप; प्रभाग क्रमांक ७ मध्ये बंद पथदिवे, कचरा आणि ड्रेनेजच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त


कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत शहरातील प्रभाग क्रमांक ७ राजीव गांधी नगर येथे मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक नगरसेवकांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक उपाध्यक्ष सुमित भैलुमे यांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरातील रस्त्यावरील लाईट बंद असल्याने नागरिकांना रात्री अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित नगरसेवकांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याचा आरोप सुमित भैलुमे युवक उपाध्यक्षा यांनी केला.

परिसरातील ड्रेनेज साफसफाई वेळेवर होत नसल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी साचत असून दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय घंटागाडी येणेही बंद झाल्याने परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. पावसाळा तोंडावर असताना मच्छर, दुर्गंधी आणि रोगराईचा धोका वाढत असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

“नागरिक वारंवार समस्या मांडत आहेत, मात्र नगरसेवक आणि प्रशासनाकडून फक्त आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात कोणतीही कामे होत नाहीत,” अशी टीका सुमित भैलुमे युवक उपाध्यक्षा कर्जत शहर यांनी केली.

प्रभाग क्रमांक ७ मधील बंद पथदिवे तातडीने सुरू करावेत, ड्रेनेज साफसफाई करावी आणि नियमित घंटागाडी सेवा सुरू करावी, अन्यथा नागरिकांसोबत तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही सुमित भैलुमे युवक उपाध्यक्षा कर्जत शहर राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी दिला आहे.



