
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जतच्या महसूल विभागाचा भोंगळ कारभार दिवसेंदिवस अधिकाधिक उघड होऊ लागला आहे. रक्षकच भक्षक होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांचे महसूल विभागातील कामे करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तलाठ्याचे प्रकरण ताजे असतानाच महसूल विभागाच्या गलथान कारभाराचे नवनवीन प्रकार आता समोर येऊ लागले आहेत.
कोंभळी येथील शेतकरी नवनाथ रामभाऊ गांगर्डे हे त्यांच्याच पडीक जमिनीची सुधारणा करण्यासाठी मुरूम उचलत होते. फळबाग लागवड करण्यासाठी त्यांच्याकडून शेतातील कामे केली जात असतानाच महसूल विभागाने तेथील जेसीबी मशीन व ट्रॅक्टर ही वाहने कर्जत तहसीलमध्ये कारवाईसाठी आणली. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही कारवाई होत असल्याचा आरोप काकासाहेब तापकीर, शेखर खरमरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.
दुसरीकडे विनापरवाना शेतकऱ्यांच्या शेतातील शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन झाले. त्याची लेखी तक्रार कर्जतच्या महसूल विभागाकडे देऊनही पंचनामा व दंडात्मक कारवाई करण्याची तसदी महसूल विभाग घेताना दिसत नाही. निमगाव डाकू तसेच कुळधरण येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मुरमाचे उत्खनन करून मोठे नुकसान झालेले आहे.
मात्र न्यायासाठी या शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत चाललेली आहे.
कामात दिरंगाई झाल्याचा ठपका ठेवून काही महिन्यांपूर्वीच कर्जत येथील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचे निलंबन झाले होते. त्यांच्या जागी नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी अ मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. मात्र शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी कर्जत महसूल कार्यालयासमोर येऊन निदर्शने, आंदोलने, उपोषण करावी लागत आहेत. महसूल मंत्र्यांनी या प्रकाराची गंभीरपणे दखल घेऊन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.